
मुंबई | Mumbai
शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार टीकास्त्र सोडले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरदेखील त्यांनी टीका केली आहे...
संजय राऊत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की, माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देत असतो. आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी आहे. सामान्य जनता, व्यापारी वर्ग, महिला एका भीतीच्या वातावरणाखाली आहेत. आदित्य ठाकरेंसोबत (Aditya Thackeray) जो प्रसंग घडलेला आहे, पोलीस कितीही सारवासारव करू दे पण हल्ला झालेला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावरदेखील हल्ला झाला असे अनेक प्रकार दररोज घडत आहेत. गृहमंत्र्यांनी आपला जुना कालावधी आणि आताचा कालावधी याची तुलना करावी. गृहमंत्री सुद्धा दिवस ढकलत आहेत, असे वाटते आहे. त्यांनी विरोधकांमधील अनेकांची सुरक्षा कमी केली आहे. त्यातून काही घातपात होऊ शकतो. नेमका राज्य सरकारचा डाव काय आहे? अशी टीका राऊतांनी केली आहे.