
मुंबई | Mumbai
आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता अवघ्या काही मिनीटांत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. निकाल काय लागणार? 16 आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार की प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालापूर्वी सूचक वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले होते. सुरत, गुवाहाटी आणि मग गोव्यात या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, शहाजी बापू पाटील सुद्धा शिंदे गटात सामिल झाले. यावेळी त्यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता.एका कार्यकर्त्याने त्यांच्या चौकशीकरता त्यांना फोन केला होता. त्यावेळी काय झाडी, काय डोंगार, सगळं ओक्के आहे, असं शहाजी बापू पाटील आपल्या कार्यकर्त्याला म्हणाले होते. त्यांची ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती.
दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण गेल्यास यावर निर्णय कोण देणार राहुल नार्वेकर की नरहरी झिरवाळ याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ हे मात्र नॉटरिचेबल झाले आहेत. झिरवाळ नॉटरिचेबल झाल्यानं चर्चेला उधाण आलंय.