
मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तयारीसाठी भाजपने (BJP) आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन १५० चा नारा दिला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजपला ६० जागांवर ऑल आऊट करु
१५० जागा जिंकणार आहात. मैदानात या, पळ कशाला काढता? कर्नाटकात 200 जागा जिंकणार होता. तशी भाषाही तुम्ही केली होती. कर्नाटक जिंकण्यासाठी सर्व फौज उतरवली. अख्खं मंत्रिमंडळ उतरवलं. फक्त राष्ट्रपतींना उतरवण्याचे बाकी होते. काय झालं कर्नाटकात? ते १५० ची भाषा करतात त्यांना ६० मध्ये ऑलआऊट करू, असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.
नोटबंदीमुळे शिंदे गट हैराण
संजय राऊत म्हणाले, सर्वाधिक काळा पैसा हा भाजपकडेच आहे. तसेच, शिवसेना फोडण्यासाठी ज्यांना ज्यांना ५० खोके देण्यात आले, ते सर्व या निर्णयाने हैराण झाले आहेत. आम्हाला २ हजारांच्या नोटा बदलून द्या, अशी मागणी ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहेत. अचानक झालेल्या या नोटबंदीच्या निर्णयामुळे या ४० आमदारांची चांगली धावपळ चालली आहे.
आमच्या जागा वाढतील
मागच्या लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार होते. १८ महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्राबाहेर. आमचा लोकसभेतील १९ चा आकडा कायम राहील. कदाचित वाढेलही. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. त्यात कुणाला त्रास होण्याचं कारण नाही. कदाचित त्यात वाढही होईल, असंही त्यांनी सांगितलं.
कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळ लवकरच मिळतील
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर आपल्याला कशाला त्यांच्यावर चर्चा करायची आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyrai) हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. घटनाबाह्य पद्धतीने काम करून त्यांनी हे सरकार आणलं. त्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला जर मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
डीएनए टेस्ट करावी लागेल
दरम्यान, कॉंग्रेसमध्ये जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण, महाविकास आघाडीत आता आपण काँग्रेस व ठाकरे गटापेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण आपल्याकडे अधिक जागा आहेत, असे विधान अजित पवार यांनी केलं होते. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? यापेक्षा प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.