
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री झालेली भेट म्हणजे सधू आणि मधूची भेट आहे. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोघेजण भेटले असतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मालेगावातील विराट सभा पाहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले होते, अशी खोचक टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटले तर आम्ही काय करणार? सदू आणि मधू भेटले, एवढेच या भेटीचे वर्णन करता येईल.
आम्हाला बालभारतीच्या पुस्तकात असा धडा होता. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जुने मित्र असतील किंवा त्यांचं प्रेम नव्याने उफाळून आले असेल. काल महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भावना उचंबळून आल्या असतील. त्यामुळे दोघेजण एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा काल जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, मी आता दिल्लीला जात असून एक, दोन दिवसांत राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आमची भूमिका समजावून सांगणार आहे.
वीर सावरकरांबाबत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडेही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही मी चर्चा केली आहे. सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांना माफीवीर म्हणणे, हे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, हे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही माहिती आहे.