
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर रविवारी (१२ नोव्हेंबर) यांनी टीका करतांना "मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही," असे म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले असून भाजपने (BJP) तुमचा बार उडवला आहे, ते आधी पाहा, असे म्हणत हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते...
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, "३१ डिसेंबरनंतर तुमचे मुख्यमंत्रीपद (CM Post) जाऊद्या. मग, तुमचा बार वरून उडेल का खालून ते पाहा. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ५० वर्षे झाले शिवसेनेचा बार उडतो आहे. भाजपने तुमचा बार उडवला आहे. दिल्लीतील भाजपच्या चरणदासांमुळे मराठी माणसांची बेअब्रू गेली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंब्य्रात हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत संघर्ष टाळला. पण, सत्ता आणि पोलीस नसते, तर चित्र वेगळे असते. दिवाळीमुळे आम्ही संयम राखला. मुख्यमंत्र्यांनी याचे उपकार मानले पाहिजेत," असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवले गेले आहेत. शिवसेनेला तोडण्याचे भाजपचे जुने स्वप्न आहे. मिंधे गटाला फोडूनही त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काही लोक तोडून शिंदे सरकार (Shinde Government) बनवले. जाऊ द्या. आता आमच्याच लोकांना आमनेसामने आणून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. हे प्रत्येक राज्यात सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि दिवाळी नसती तर ती शाखा आम्ही ताब्यात घेतली असती, असेही राऊत यांनी म्हटले.
तसेच लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) शिंदे गटातील आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले की, ते आताच भाजपात आहेत. त्यांचे अंतर्वस्त्र पाहिलं तर त्यावर कमळच आहे. त्यांच्या फुल पँन्टमध्ये खाकी हाफ चड्डी आहे. ती आताच घालायला सुरुवात केली आहे. आतमध्ये कमळाची अंडरविअर आहे. तुम्ही कधी गेला तर त्यांना विचारा दाखवा काय आहे ते? त्याशिवाय ते मुख्यमंत्री पदावरती राहू शकत नाही. गुलामांना स्वतःचे मत आणि स्वाभिमान नसतो, असा हल्लाबोल यावेळी राऊतांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची टोळी ही चोरांची गँग आहे. दोघांमध्ये भांडण लावण्यावर भाजपची नेहमीच नजर असते. दोघांमध्ये भांडणं लावणे हाच भाजपचा विचार आहे. जात, धर्माच्या नावावर पार्टी तोडण्याचा भाजपचा विचार आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. आता हेच लोक भाजपचे प्रचारक आहे का? सत्ता, पैसा आणि उद्योग हाच भाजपचा विचार आहे. लोकांना गुलाम बनवणे हा भाजपचा विचार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.