संजय राऊत हे शरद पवारांनी दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहे- चंद्रकांत पाटील

jalgaon-digital
3 Min Read

पुणे |प्रतिनिधी| Pune

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायचे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे या शरद पवार यांच्या अजेंड्यावर संजय राऊत काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी दिली.

पुण्यातील हडपसर येथील सातववाडी येथे प्रमोद सातव यांच्या कार्यालयाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, आम्हाला जे आकलन आहे, त्या आकलनमध्ये संजय राऊत हे शरद पवारांनी दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायच आहे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. यासंदर्भात विचारले असता, ‘२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगर भाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही, अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती, तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे

दरम्यान, दुसऱ्या एका कार्यक्रमानंतर बोलतानाही चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजकारण गढूळ झालय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर त्यांनी राऊतांना आता शांत बसवावे. सर्व काही ठिक होईल. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे असा माझा अंदाज आहे, उद्धवजींनी बटन ऑफ करून राऊतांना शांत करावं. आपोआप सगळं शांत होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेना-भाजपने एकत्र यावे असं रिपाइं नेते रामदास आठवले वारंवार सांगत असतात. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले मनापासून त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणार जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप – सेना एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.

२०२४ मध्ये काँग्रेसला बाजूला ठेऊन सगळे एकत्र येणार आहेत. त्यामुळे शुभारंभालाच फाटाफूट झाली आहे. उद्घाटनाचा नारळ फोडतानाच फाटाफूट ठरलेली आहे. २०२४ ला बँडबाजा वाजणारच आहे. राजकारणात स्वप्न बघायला काही हरकत नसते, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सर्व अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ सुरू आहे. यात कोण टिकतं ते बघू. राणे समर्थ आहेत. भाजप राणेंच्यापाठी खंबीर उभा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *