मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाला. ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वकिलांकडून तिन्ही दिवस युक्तिवाद करण्यात आला...
या युक्तिवादात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याची ठाकरे गटाची मागणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) फेटाळली आहे.
पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली आहे. या प्रकरणावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, आज निर्णय लागेल असे अपेक्षित होते. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या मुद्द्यावर निर्णय घेणे सोपे नाही.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाला त्यावर निर्णय घ्यावाच लागणार आहे. नबाम रेबिया निकाल डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेता येईल असे नाही, असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावे, हे आम्ही स्पष्ट सांगितले आहे.
त्याच्या सुनावणीला वेळ लागला तरीही चालणार आहे. पण शेवटी तावून सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशासमोर पारदर्शक निकाल येईल. भविष्यात कोणतेही सरकार पैसा देऊन विकत घेतलेल्या बहुमताच्या जोरावर पाडले जाऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अपात्रतेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आमच्या मते सर्व बंडखोर आमदार अपात्र आहेत. केवळ निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे.
हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यावे म्हणून आम्ही प्रयत्न करूच. शेवटी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे हे घटनापीठाला ठरवावे लागेल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्यात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थीती आहे. लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुरूंगात असताना मलाही मारण्याचा प्रयत्न झाला. यावर योग्यवेळ आल्यानंतर बोलेल, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.