
मुंबई | Mumbai
आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर भेट देण्यासाठी येत असतात.
मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांच्या आडून कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेतल्या.
ते म्हणाले की, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप आहोत. आम्ही तुमच्या भावनांची आम्ही दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचं काम सरकारकडून नक्की केले जाईल आणि हे सर्व काम करत असताना आपल्याला विश्वासात घेतले जाईल.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार कोल्हे यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेल्यानंतर आम्ही गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचे देखील खासदार अमोल कोल्हेंनी म्हटले होते.