जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
सागर पार्कवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवत काढण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही लक्ष दिले जात नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी स्वतः साफसफाई करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सत्ताधारी नगरसेवकांवर ही वेळ येत असेलतर, सर्व सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सागरपार्क मैदानावर मनपा प्रशासनातर्फे ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी नागरिक फिरायला येतात. तरुण त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी गवत वाढले आहे. वार्डाचे नगरसेवक या नात्याने नागरिकांनी बंटी जोशी यांच्याकडे गवत काढण्याबाबत तक्रारी केल्या आहेत.
त्यानुसार बंटी जोशी यांनी मनपा प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करुन पाठपुरावा करीत असतांनाही दाद न दिल्याने, अखेर सोमवारी स्वतः बंटी जोशी यांनी गवत काढण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतः साफसफाई करुन प्रशासनाचा निषेधदेखील त्यांनी केला आहे.
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
बंटी जोशी हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहेत. महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे. असे असतांनाही नगरसेवकाला प्रशासन दाद देत नसेलतर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवालदेखील उपस्थित होत आहे.
नगरसेवक जोशी यांनी जवळपास दहा वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.