माहेगाव|वार्ताहर|Mahegav
महाराष्ट्रातील शेतकर्यांची करोनाच्या नावाखाली लूट करणार्या सरकारला स्मशान घाट दाखविणार असल्याची माहिती माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.1 ऑगस्टपासून राज्यात दूध दरवाढ प्रश्नी रयत क्रांती संघटना रा.स.प. यांच्यासह भारतीय जनता पार्टी दूध बंद आंदोलन करून दुधाचे टँकर अडविणार आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने दूध दरप्रश्नी आंदोलन केले. आज तर तेच सत्तेत आहेत. मागील सरकारप्रमाणे यांनीही शेतकर्यांना पाच रुपये अनुदान द्यावे.
अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल. पण दुधाचा एक थेंबही गावाबाहेर जाऊ देणार नाही. करोनामुळे शेतकर्यांचा माल विकला जात नाही. कांदा चाळीतच सडला. द्राक्षाची विक्री झाली नाही. अशा परिस्थितीत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. दूध उत्पादकांपेक्षा सरकार व्यापार्यांना सांभाळत आहे.
पिशवीच्या दुधाचा एकही रुपया कमी झाला नाही. तर मग शेतकर्यांचे दुधच का कमी भावात खरेदी करता? परवडत नसेल तर सरकारने दुधाला दहा रुपये, दूध भुकटीला 50 रुपये द्यावे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिले. महाराष्ट्रातील जाणते राजे शेतकर्यांसाठी लढतात की शेतकर्यांच्या प्रपंचाशी खेळतात ? असा खोचक सवाल शरद पवार यांना केला आहे.
केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केली. अशी वल्गना करणारे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयात केलेली भुकटी दाखवावी. मी राजकीय संन्यास घेईल. नाही तर केंद्राने भुकटी आयात केली नाही, याचे पुरावे देतो. तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या.
– माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत