मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मितीतील कामाबद्दल कौतुक केले आहे तर करोना संकटाची जाणीव राज्यातील
भाजप नेत्यांना करुन द्यावी म्हणजे ते करोना संकटाचा राजकीय खेळ थांबवतील असा टोला त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 परिषेदेला संबोधित केले होते.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे." असे म्हणत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
तसेच "करोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला.त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील." असा टोला त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.
G20 Summit मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जी -20 परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. आम्ही जी -20 च्या कुशल कामकाजासाठी डिजिटल सुविधांना आणखी विकसित करण्यासाठी भारताच्या आयटी प्रगतीची ऑफर देत आहोत. आपल्या प्रक्रियेतील पारदर्शकता समाजांना एकत्रितपणे आणि आत्मविश्वासाने संकटाशी लढायला मदत करते. पृथ्वीवरील विश्वासाची भावना आपल्याला निरोगी आणि समग्र जीवनशैली जगण्यास प्रेरणा देईल, असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
मल्टी-स्किलिंग आणि टॅलेन्ट पूल तयार करण्यासाठी पुन्हा कौशल्य निर्माण केल्यास आपल्या कामगारांची प्रतिष्ठा आणि लवचिकता वाढेल. नव्या तंत्रज्ञानाचे मूल्य मानवतेला किती लाभ झाला यावर मोजले गेले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जी -20 नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या समन्वय आणि प्रयत्नाने करोना संकटातून निश्चितच उभारी घेता येईल, असं म्हणत शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचे आभार मानले.