संगमनेर (प्रतिनिधी)- चीन प्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे, असे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
1962 व आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे. 45 वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खोर्यात चीनच्या आगळीकीमुळे आपले 20 जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच शरद पवार यांनाही असेलच. असे ते म्हणाले.