दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :
शासकीय हमी भावाने रब्बी हंगामातील ज्वारी (दादर), मका व गहूसाठी अनेक शेतकर्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून धान्य खरेदी केंद्र सुरू केले होते मात्र काही दिवसांत ते बंद करण्यात आले. त्यास राज्य शासनाने मुदतवाढ देवून धान्य खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे शेतकर्यांच्या घरात अजूनही धान्य पडूनच आहे. त्यामुळे धान्य खरेदी केंद्राला मुदतवाढ देवून पुन्हा खरेदी सुरू करावी अशी मागणी आ.जयकुमार रावल यांनी केली आहे.
शेतकर्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने धान्य खरेदी करण्यासाठी शासनाने शेतकर्यांकडून ऑनलाईन नोंद करायला लावली होती, त्यात शिंदखेडा तालुक्याच्या खरेदी विक्री संघात दादरची नोंदणी 1530 शेतकर्यांनी, मकाचा नोंदणी 365 शेतकर्यांनी तर गहू खरेदीसाठी सहा शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. ही ऑनलाईन नोंदणी करून 3 महिन्याच्या वर कालावधी उलटूनही राज्यशासनाने अद्यापही खरेदी केंद्र सुरू केले नव्हते, मोठ्या प्रतीक्षेनंतर धान्य खरेदी केंद्र सुरू केले होते. मात्र काही धान्य खरेदी करुन हे केंद्र बंद झाले. परंतु शेतकर्यांच्या घरात अजूनही धान्य पडून आहे. त्यामुळे खरीपासाठी शेतकर्यांना भांडवलची गरज असतांना माल घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, त्यामुळे त्या धान्य खरेदी केंद्रास मुदतवाढ देवून ही केंद्रे पुन्हा सुरू करावी अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.