मुंबई | Mumbai
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. तसेच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं. आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
“एका महिलेसाठी जवाहरलाल नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं विधान रणजीत सावरकरांनी केल्यामुळे यावरून आता अजून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सावकरांबद्दल असलेला आदर दाखवून थेट राहुल गांधींना जाब विचारायला गेल्याने रणजीत सावरकर यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. याच मुद्द्यावर आज, रणजीत सावरकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.
राहुल गांधी यांचं विधान काय?
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.