Friday, April 26, 2024
Homeराजकीयपाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज - रामदास आठवले

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – रामदास आठवले

पुणे |प्रतिनिधी| Pune

“पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांशी चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

- Advertisement -

पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. आठवले म्हणाले, पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल तर आतंकवादी कारवाई थांबवून पाक व्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपार लढाई करायला लागेल, पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही.

“जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली. भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

“आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) भक्कम साथ आहे. ‘रिपाइं’ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करू नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपने मनसेच्या सोबत जाणे योग्य होणार नाही,” असा सल्ला देखील आठवले यांनी भाजपला दिला.

पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर केले भाष्य

– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘रिपाइं’ची शाखा

– पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल

– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आरपारची लढाई करावी लागेल

– जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी लागेल

– पाकिस्तानने छुपे हल्ले बंद करायला हवेत

– दिल्लीतील केंद्र सरकार स्थिर आहे, राज्य सरकार पडण्याचा विचार नाही

– शरद पवार चांगले अनुभवी राजकारणी आहेत

– सरकारी यंत्रणा तटस्थपणे काम करत आहेत

– पदोनत्ती आरक्षणासाठी रिपाइं प्रयत्नशील

– केंद्राला नावे न ठेवता राज्य सरकारने जनतेसाठी काम करावे

– महापालिका निवडणुकीत रिपाइं भाजपसह लढणार

– रिपाइं सोबत असताना भाजपने मनसेबरोबर युती करू नये

– पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने करांत सवलत द्यावी

- Advertisment -

ताज्या बातम्या