मुंबई | Mumbai
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे.
या निवडणुकीत एक-एक मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपला उमेदवार विजयी करम्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, याच दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांत नाराजी असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मतांचा कोटा कमी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होत.
मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. भाजपकडून कालपासून अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर अजिबात नाराज नाहीत. आताच माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे. कोणीही कोणावर नाराज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.