मुंबई | Mumbai
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक (Rajya Sabha Election) प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर यशोमती ठाकूरांनीही नाना पटोलेंच्या हाती मतपत्रिका दिल्याने भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. आतापर्यंत झालेली सर्व मंत वैध आहेत असं निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळात सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून ठरलेल्या रणनीतीनुसार टप्याटप्प्याने मतदान केले जात आहे.
दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २३८ आमदारांनी मतदान केले आहे. अजूनही शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान बाकी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आलेला निर्धारित कोटा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची चुरस आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.