दुधाच्या प्रश्नावर एवढी चर्चा झाली असती तर बरे वाटले असते..!

माजी खा. राजू शेट्टी यांची सुशांतसिंग प्रकरणी खोचक टीका
दुधाच्या  प्रश्नावर एवढी चर्चा झाली असती तर बरे वाटले असते..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केली.

दूध दरासंदर्भात आयोजित मोर्चाच्या आधी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर तोफ डागली. राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले असताना दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष देत आहेत का? असे विचारले असता शेट्टी म्हणाले, राज्यात हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही.

शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एवढेच काय तर अनेक करोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते.

तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या उसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल, लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं.

शेतकर्‍यांसाठी कोणी आंदोलन करीत असेल, त्या आंदोलनातून शेतकर्‍यांना न्याय मिळत असेल, तर अशा आंदोलनाला आमची अजिबात हरकत नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे, असे सांगत भाजपचा समाचार घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com