प्रशासनाला इतकंही कळत नाही का?, १२ श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राज ठाकरेंचा संतप्त सवाल
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडल्यानंतर या कार्यक्रमाला उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे गालबोट लागलं. यावरून आता महाराष्ट्र सरकारसह प्रशासनावर नियोजनावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उन्हाचा कडाका माहिती असतानाही अशा प्रकारे कार्यक्रमाचे आय़ोजन कसे केले गेले? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना सरकारला टाळता आली नसती का? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. काही वेळापूर्वीच ट्वीट करत राज ठाकरेंनी सरकारला हे सगळं सुनावलं आहे.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का, असा परखड प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.