
मुंबई | प्रतिनिधी
राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा पुरावा आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली.
गृह विभागाने अलीकडेच सर्वसामान्य नागरिकांच्या मंत्रालय प्रवेशावर निर्बंध आणले आहेत. नागरिकांची कामे स्थानिक ठिकाणीच व्हावीत म्हणून सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. तरीही मंत्रालयात नागरिकांची गर्दी होत आहे. ज्या दिवशी मंत्री मंत्रालयात असतात त्या दिवशी मंत्रालयात मोठी गर्दी उसळते. या दिवशी मंत्रालय प्रवेशासाठी मंत्रालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक ताटकळत उभे राहतात. त्यांना सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च या सरकारने केला आहे. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.