मुंबई । प्रतिनिधी Mumbai
ज्या प्रकरणात 'ईडी' ( ED) एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांचे खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली आहे. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक(NCP spokesperson Nawab Malik ) यांनी शुक्रवारी केला.
केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणित बदलतील असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आता कुणीही अशा यंत्रणेला घाबरत नाही, असेही मलिक यांनी बजावले.
भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे जळगाव जिल्ह्यातील नेते एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी भाजपवर टीका केली.
ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही, त्यामुळे ते चौकशीला घाबरत नाहीत. यंत्रणांचा दुरुपयोग करणे हे भाजपचे काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथेही विरोधकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप मलिक यांनी केला.