जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
भाजप पक्षाकडून ओबीसी नेत्यांना टारगेट करणे, छळ करणे ही आजची बाब नाही. मीच काय पण अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या इतका छळ कुणाचाही झाला नाही.
पक्षाची साथ दिली नाही, विरोधात बोलले की लगेच मागे ईडी, सीबीआय लावून छळ केला जातो. पक्ष सोडल्यानंतर मी असो की छगन भुजबळ आमच्या मागे पक्षानेच ईडी लावण्याचे हे षडयंत्र केल्याचे सिध्द झाले असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज सोमवारी त्यांच्या जळगाव शहातील शिवराम नगर येथील निवास्थानी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
माझ्यामागे ईडी लावणारे भाजपचेच
ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले याची आठवण करुन देत धमकीवजा इशारा दिला होता.
यावर आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे पुढे म्हणाले की, भाजपने सुरुवातीपासूनच ओबीसी नेत्यांना न्याय दिलेला नाही.
भाजपमधील सर्वच नाही मात्र काही नेत्यांकडून नेहमीच ओबीसी नेत्यांना टारगेट करण्याची भूमिका राहिली आहे. माझ स्वतःच उदाहरण असल्याचेही खडसे म्हणाले.
वेगवेगळे आरोप करायचे, ओबीसीं नेत्यांना बदनाम करायचे हे माझ्याबाबत असेल, बावनकुळे, भाऊसाहेब फुंडकर असे किती तरी नेते आहेत, त्यांचा छळ झाला आहे.
मात्र पक्ष म्हणून अनेकांनी तो सहन केला. चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिल्यामुळे आता नाथाभाऊ, भुजबळ यांच्यामागे ईडी लावणारे दुसरे कोणी नाही तर भाजपचेच होते, हे त्यावरुन स्पष्ट झालय असल्याचा आरोपही खडसेंनी कुणाचेही नाव न घेता केला. छगळ भुजबळ अशा धमक्यांना घाबरणारे नसल्याचेही ते म्हणाले.