मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीला (MVA Govt) MIMचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी दिलेल्या युतीच्या ऑफरची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
जलील यांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने अमान्य केला असला तरी मात्र ते आग्रही आहेत. जलील यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची (shivsena) ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी बैठकीदरम्यान सांगितलं की, शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत.
तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेविषयीही नापसंती व्यक्त केली. विधानपरिषदेतील १२ आमदारांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. हा लोकशाहीचा खून असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना राज्यात शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याची सूचना केली. तसेच विरोधकांचे मनसुबे हाणून पाडा, असेही त्यांनी सांगितले.