मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई | प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार उदासीन आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एक बोलताहेत, उपमुख्यमंत्री दुसरे तर अर्थमंत्री तिसरेच बोलत आहेत. यावरुन मराठा आरक्षणाबाबत सरकारचे एकमत नाही हे स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे केली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेवून तो लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा आणि ओबीसी समाज अशी फूट पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी पक्ष मराठा आरक्षणाबाबत ठाम आहे. मात्र, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी बीडमध्ये जसे हल्ले झाले तसे महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच झाले नाहीत. पोलिसांनीही यामध्ये कोणताच हस्तक्षेप केला नाही. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बीडमध्ये हल्ले होण्यापूर्वी सरकारी गुप्तचर यंत्रणा काय करत होती पोलिसांनीही हस्तक्षेप का केला नाही? मग ते हल्ले ठरवून झाले होते का? असे सवालही पाटील यांनी केले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com