“...त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”: 'त्या' फोटोवरुन रोहित पवारांचा मनसेला टोला

रोहित पवार
रोहित पवार

मुंबई । Mumbai

अयोध्या (Ayodha) दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. परंतु राज यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं टाळलं होतं. त्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजान (Prakash Mahajan) यांनी थेट शरद पवार (sharad pawar) यांचे नाव घेत त्यांनीच रसद पुरवल्याचा आरोप केला होता. आता मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी फोटोज शेअर केले आहेत.

यात बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) आणि शरद पवार हे एकत्र दिसत आहेत. या फोटोची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून राजकारण रंगलेलं असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी MNS Adhikrut ला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा. तर पवार साहेब हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल''.

फोटो नेमका कोणत्या कार्यक्रमातील?

बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे.

राज ठाकरेंनी काय केला होता आरोप?

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप असून महाराष्ट्रातून यासाठी रसद पुरवली जात आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलतांना केला होता. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात भावना समजत नाहीत. ऐन निवडणुकीवेळी महाराष्टातील मनसेच्या कार्यकर्त्यांमागे कोर्ट कचेरीच्या गोष्टी मागे लावल्या असत्या. उत्तर प्रदेशातील एका खासदाराला आव्हान देणं शक्य आहे का?, असा सवालही त्यांनी केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com