मुंबई l Mumbai
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता नारायण राणेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत राणेंवर पलटवार केला आहे.
'याआधी देवेंद्र फडणवीस हे भविष्यवाणी करून थकले आहे,त्यांची भविष्यवाणी ही खरी ठरली नाही. त्यांच्या नंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली. ते झोपेतून उठून भविष्यवाणी करत होते, पण काहीही फरक पडला नाही. आता नारायण राणे यांनी हा मोर्चा सांभाळला आहे. राणे हे २३ वर्षांआधी मुख्यमंत्री होते, त्याकाळापासून त्यांचे कार्यकर्ते नवसाचे कोंबडे आणि बोकडे आणून देत आहे, त्यांना दाखवत आहे, त्यामुळे त्यांना बोलण्याशिवाय पर्याय नाही' असा टोला मलिक यांनी लगावला.
'आमचं सरकार हे खंबीर आहे. ५ वर्ष पूर्ण करेल आणि आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही सत्तेत पाच वर्षांसाठी आलो नाही. तर २५ वर्ष महाविकास आघाडीचे सरकार राहणार आहे. त्यामुळे जुने भाजपचे नेते आता बोलून थकले आहे. आता नवीन प्लेअरला जबाबदारी दिली आहे, त्यामुळे ते बोलत आहे पण कुणाच्या बोलण्यामुळे सरकार पडत नाही' असंही मलिक यांनी ठणकावून सांगितलं.
तसेच नारायण राणेंच्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातलं सरकार ५ वर्ष चालेल.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
तसेच,'नारायण राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकासआघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. या संख्याबळावरती हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.' अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते अनिल परब यांनी राणेंच्या विधानावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.