
दिल्ली | Delhi
केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरु झाली. अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.
अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरुन आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केलाय. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे, असा युक्तिवात अजित पवार गटाने केलाय.
पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. आमच्याकडे विधीमंडळातील बहुमत आहे. दीड लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. दरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे नीरज कौल यांचा युक्तिवादावर मनु सिंघवी काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे आहेत. तसेच नागालँडचे 7 आमदार आमच्यासोबत आहेत, असं अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने शिवसेना प्रकरणाचा दाखला दिलाय. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला.
शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. एका सहिने नियुक्त्या केल्या जात होत्या. पक्षात यापूर्वीच्या संघटनात्मक नेमणूक कायद्याला धरुन नव्हत्या, असा दावा अजित पवार गटाने केलाय. प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकारी ओळख करुन देणं शक्य होणार नाही, असंही अजित पवार गटाचे वकील म्हणाले आहेत. काँग्रेसच्या फुटीचादेखील दाखला देण्यात आला. अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी आक्रमक युक्तिवाद केलाय. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद वकील मनिंदर सिंह यांनी केला. यावेळी मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.
शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे. तर शरद पवार गटाची निवड बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला. यावेळी पी. ए. संगमा यांच्या प्रकरणाचादेखील दाखला देण्यात आला.आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा. सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र योग्य आहे. त्यांची तपासणी देखील करा. जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये कोणतीही चूक नाही, असा दावा नीरज कौल यांनी केलाय.