
मुंबई | Mumbai
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून या निकालावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाच्या झालेल्या मोठ्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही शरद पवारांनी लक्ष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले, की कर्नाटकमध्ये जवळपास दुपट्ट जागांवर काँग्रेसला यश मिळत आहे. सत्तेचा गैरवापर केल्यानं भाजपचा परभाव झाला आहे. शरद पवारांनी कर्नाटकातील यशासाठी काँग्रेसचं अभिननंदन केलं आहे. तसंच खोक्यांचं राजकारण लोकांना नापसंत असल्याचं म्हणत भाजपवर टीका केली आहे. मोदी, शाहांनी सभा घेऊन आणि भाजपचे नेते कर्नाटकात तळ ठोकून असतानाही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भावनात्मक लोकांना राजकारण चालत नाही, असंही ते म्हणाले.
फोडाफो़डीचं राजकारण भाजपकडून होऊ शकतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, की भाजपला फोडाफोडी करण्याची सवय आहे. मात्र यावेळी जनतेनंच खबरदारी घेतली आहे की फोडाफोडीचं राजकारण होऊ नये. दुपट्ट जागांवर काँग्रेसला यश मिळालं आहे. पुढे ते म्हणाले, की राहुल गांधींच्या भारत जोडोचा कर्नाटकात उपयोग झालाय असं दिसतंय. पण मी अजून खोलात गेलो नाही.
राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचंही त्यांनी मान्य केलं. कर्नाटकसारखा कौल महाराष्ट्रात पाहायला मिळेल का? असं विचारलं असता, ते म्हणाले की लोकांना इथेही बदल हवा आहे. तो पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल. महाविकास आघाडीतील पक्ष वेगळे लढले तर भाजपला हरवू शकतील का? असा सवाल केला असता ते म्हणाले, की हे माहिती असताना वेगळं का लढायचं? यातूनच त्यांनी संकेत दिले की महाविकासआघाडी आता महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी एकत्र येणार आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये दिलेल्या ‘बजरंग बली की जय’ घोषणेचा समाचार घेतला. धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळी त्याच्यात यश येतं. पण लोकांना हे आवडत नाही. बजरंग बली की जयचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचं कारण नव्हतं. धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असल्याची शपथ आम्ही संसदेत घेतली. पण अशी शपथ घेतलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं शोभत नाही. ते काम त्यांनी केलं. त्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे, असं शरद पवार म्हणाले.