दिल्ली । Delhi
ज्ञानवापी मशिद प्रकरणाने (Gyanvapi Masjid Case) देशातील वातावरण तापलं आहे. दरम्यान केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) ज्ञानवापी मशिदी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
अयोध्येचा विषय संपल्यानंतर देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल असं आम्हाला वाटत होतं. मात्र भाजपचे विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशाप्रकारची आणखी प्रकरणं समोर आणून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. तसेच वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे. मागील ३००-४०० वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असं शरद पवार म्हणाले.
मोदी सरकार आणि भाजपा आज देश चालवत आहे. त्यांचा अजेंडाच हा आहे की एक विषय संपल्यावर दुसरा विषय समोर आला. काहीही करुन देशात कायम हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपावा आणि आपल्याला संप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे, अशी टीका पवारांनी केलीये.
देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारची भूमिका घेत आहे, ती कदापिही योग्य नाही, असे सांगत पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला