मुंबई | Mumbai
गेल्या १२ दिवसांपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या अमरावतीच्या राणा दाम्पत्याची अखेर गुरुवारी सुटका झाली आहे. नवनीत राणा (navneet rana) यांना भायखळा महिला कारागृहात तर रवी राणा (ravi rana) यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं काल(बुधवार) जामीन मंजूर केला. त्यानंतर आज राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका झाली आहे.
तुरुंगातील १२ दिवसांच्या वास्तव्यामुळे नवनीत राणा यांच्या अनेक शारीरिक व्याधी उफाळून आल्या आहेत. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. आता लिलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर पुढील उपचार केले जातील.
राणा कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याच्या दुखणे आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवत आहे. काल जे.जे. रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. थोड्याचवेळात नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून सुटका होणार आहे. त्यानंतर रवी राणा थेट लिलावती रुग्णालयात येतील.