Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयनाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीला मिळेल बळकटी

नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीला मिळेल बळकटी

शहादा । ता.प्र.- NANDURBAR

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बळकटी मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच एकदिलाने काम करून एक ध्येय निश्चित ठेवल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार

- Advertisement -

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून सरकारला कुठलाही धोका नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ना.अनिल देशमुख हे आज शहादा दौर्‍यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत लोणखेडा येथील पाटीदार मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, माजी आ.उदेसिंग पाडवी, माजी आ.नरेंद्र पाडवी, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, नगरसेवक इक्बाल शेख, कार्याध्यक्ष सागर तांबोळी, कमलेश चौधरी, जकीरमिया जहागीर, चंद्रकांत पाटील, एन.डी.पाटील, सुरेंद्र कुवर, नितीन पाडवी, अ‍ॅड.अश्विनी जोशी, पुष्पा गावित, अमृत लोहार आदी उपस्थित होते.

ना.देशमुख पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्हयात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. मात्र अनेकांनी पक्षांतर केले, काही नेते दुसर्‍या पक्षात गेल्याने सध्या राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे.

मात्र, पक्ष मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने काम केल्यास पक्षाला पुन्हा बळकटी मिळणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार आहे.

त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला ताकत मिळणार आहे. संपूर्ण खान्देशात त्यांच्यामुळे वेगळेच चित्र निर्माण होणार आहे. चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचे काम चालू असून सर्व पक्षाचे नेते एकत्र काम करीत आहे. पाच वर्ष या सरकारला कुठेही धक्का लागणार नाही व सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासही ना.देशमुख यांनी व्यक्त केला.

आता उटणे काढण्याची वेळ आली आहे ः एकनाथराव खडसे

माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यावर 40 वर्ष काँग्रेसचे प्रभुत्व राहिले आहे. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही, जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. डॉ.विजयकुमार गावित व खा.हिना गावित यांना भाजपात मीच आणले. त्यामुळे जिल्हयात भाजपाची ताकद वाढली. मात्र, ही परिस्थिती बदलायची आहे. या जिल्ह्यात पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठा अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्ते व्यक्तीपेक्षा संघटना महत्वाची आहे. हे धोरण स्विकारत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. मात्र, आता नाथाभाऊ तुमच्यासोबत आहे. सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष मजबूत करायचा आहे. यापुढील प्रत्येक निवडणूकीत राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे. पक्षात अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. परंतु पक्षांतर बंदी कायद्यामुळे अडचण येत आहे. लवकरच या भागात मोठा मेळावा घेऊन राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ. गेल्या चाळीस वर्षात भाजपा वाढवली. अनेक मान अपमान सहन केलेत. आता त्यांचे उटणे काढण्याची वेळ आली आहे. सध्याच्या खा.डॉ.हिना गावित यांना मतदान करायला कोणी तयार नव्हते. परंतु त्यावेळी प्रकाशा येथे मोठा मेळावा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळेच त्या खासदार झाल्या, अशी आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली. आभार एन.डी.पाटील यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या