
नाशिक | Nashik
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) भाजपच्या (BJP) नेत्यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे.
त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचेही 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर झळकले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार (Ncp MLA) आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे.
जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास अजित पवार स्वत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना झिरवाळ यांनी पुढील दीड वर्षात अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तर नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असे वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी १४५ आमदारांचे (MLA) संख्याबळ पाहिजे." तसेच महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा तो पक्ष लढवणार असे अजित पवारांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे अजित पवार यांचा स्वभाव पाहता अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नावाची चर्चा करु नका असे ते अधिकारवाणीने बोलू शकले असते पण त्यांनी तसे न करता एकप्रकारे मूक संमती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.