
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोर-गरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले आणि शाळा उघडल्या. लोकसहभातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील ( Minister Chandrakant Patil ) यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole )यांनी शुक्रवारी केली.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण (Paithan )येथे बोलताना महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असे वादग्रस्त विधान केले. या विधानाचा नाना पटोले यांनी समाचार घेतला.
भाजपच्या नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी निघाली असून महापुरुषांबद्दल अपमान करणारी वक्तव्ये करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपच्या एकाही नेत्यांने अजून माफी मागितली नसताना भाजपचे नेते चंद्राकात पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी आणि देणगी यातील फरक तर कळतो का? असा संतप्त सवालही पटोले यांनी केला.
समाजाच्या विकासासाठी सरकारने निधी खर्च करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. शिक्षणावर खर्च करायचा नाही तर मग काय सरकारच्या जाहीरातबाजीवर करोडो रुपयांची उधळपट्टी करायची काय? सरकार जनतेच्या आरोग्य, शिक्षणासह कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करणार नाही तर मग कशावर करणार? सरकार जनतेसाठी पैसे खर्च करते म्हणजे काय उपकार करत नाही. जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरायचा असतो हे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्याला माहित नसावे. कारण त्यांचा पक्ष दोन-चार उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला आहे आणि या उद्योगपतींच्या घरीच चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे सरकार पाणी भरते, अशी जळजळीत टीकाही पटोले यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशीच अवमानकारक वक्तव्ये केली. भाजपचे प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपतींचा अपमान करणारे विधान केले. त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त केला जात आहे. परंतु भाजपचे नेते एवढे निर्ढावले आहेत की साधी माफी मागण्याचे सौजन्यही या लोकांकडे नाही. हा सत्तेचा माज असून हा माज जास्त काळ टिकत नसतो. ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवले तीच जनता तुमचा माज उतरवेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.