
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली (Jalana Antaravali) गावामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी १७ दिवस उपोषण केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले होते. मनोज जरांगे-पाटील यांनी काही मागण्या पूर्ण होण्यासाठी आग्रह धरला. अनेक मंत्री, नेते यांनी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी १७ दिवसांनी उपोषण सोडले. परंतु या उपोषणांवरून विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी मात्र सोडत नाहीत.
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसवले होते, असा मोठा आणि गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलानात जाणून बुजून लाठीचार्ज करण्यात आला. तर हे सरकार दोन समाजात भांडणं लावत असल्याचा आरोप देखील नाना पटोलेंनी केलाय.यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापणार असल्याचे चिन्ह आहे.
यासोबतच, इंडिया आघाडीवरील बैठकीचे लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवले. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेले होते, हे आता सिद्ध झालेले आहे.
दरम्यान, नाना पटोलेंनी सरकारवर आरोप केला असून ते म्हणाले, जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. ३१ तारखेच्या मध्यरात्रीच आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती.
या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली.इंडिया आघाडीवरील बैठकीचे लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचे काम भाजप आणि येड्याच्या (EDA) सरकारने केले आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.
दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाले पाहिजे. कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे तर जातीनिहाय जनगणना करुन मिळाले पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिले पाहिजे, असे ठाम मत नाना पटोले यांनी मांडले.