मुंबई / प्रतिनिधी
राज्याच्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई, गोंदिया, अहमदनगरमधील नारायणडोह, पालघर आणि हिंगोलीत नवीन कारागृह बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली
राज्यातील मध्यवर्ती कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याबाबत मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर गृहविभागाने सविस्तर उत्तर दिले आहे. राज्यातील ६० कारागृहातील कैद्यांची क्षमता २४ हजार ०३२ आहे. पण जानेवारी २०२१अखेर पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील कारागृहात ३२ हजार ९९६ कैदी आहेत. म्हणजे क्षमतेपेक्षा १३७ टक्के अधिक कैदी आहेत.
क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी
मुंबई, येरवडा, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर आणि तळोजा या मध्यवर्ती कारागहातील कैदी ठेवण्याची क्षमता १४ हजार ४९१ आहे. जानेवारी २०२१पर्यंतच्या आकडेवारी नुसार या नऊ कारागृहातील कैद्यांची संख्या २३ हजार ७५७ कैदी आहे. म्हणजे क्षमतेपेक्षा १६५ टक्के अधिक कैदी आहे. महिला कारागृहात महिला कैदी ठेवण्याची क्षमता १ हजार २७५ आहे. पण जानेवारी २०२१च्या आकडेवारीनुसार १ हजार ४२१ महिला कैदी आहेत.
नवीन बॅरेक्स बांधण्याची योजना
येरवडा, पुणे आणि ठाणे या कारागृहातील उपलब्ध जागेवर दुसरे कारागृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. जिल्हा आणि खुल्या कारागृहांमध्ये अतिरिक्त तसेच नवीन बॅरेक्स बांधण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.