मुंबई | Mumbai
ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य गेल्या दोन महिन्यांपासून धुमसतंय. या ठिकाणी जातीय हिंसाचार सुरु असून यामध्ये आजवर १३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. विस्थापित झालेले हे लोक सध्या शरणार्थी कॅम्पमध्ये राहत आहेत. यावर विरोधकांनी सुरुवातीपासून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. या परिस्थितीची जाण व्हावी यासाठी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन करत कान टोचले आहेत. भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी ईशान्य भारतातील राज्यांसाठी जे प्रयत्न केले ते आता वाया जातील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Crime News : विळ्याने वार करत मुलाने केली सावत्र आईची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल
राज ठाकरे पत्रात म्हणतात..
सस्नेह जय महाराष्ट्र, ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं. असो, मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा.
Buldhana Bus Accident : मुलाला कॉलेजला सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, बुलढाणा अपघातात आई वडिलांसह मुलीचा मृत्यू