मुंबई l Mumbai
मुंबईत करोनाचा लाट आता ओसरत चाललेली आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतं आहे. मात्र, रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारनं केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.
रोहित पवार यांनी म्हंटले आहे कि, "श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं." तसेच "तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,"अशा शब्दांत रोहित पवार यांनी केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. पण, 'रेल्वे विभाग या कामात खोडा घालत आहे', असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.