संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner
भाजपचे आमदार अस्वस्थ होऊ नये म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे वारंवार बोलत आहे की,
लवकरच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, पण त्यांचे हे बोलणे म्हणजे कवितेचे धृव पद आहे. जे वारंवार बोलले नाही तर त्यांचे आमदार अस्वस्थ होतील, मात्र महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे पाच वर्षे चालेल, निश्चितपणे चांगले काम करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत भाजपने एकनाथ खडसे यांना वाईट वागणूक दिल्याचे म्हटले.
घुलेवाडी फाटा येथील नवीन न्यायालय इमारतीची पाहणी केल्यानंतर ना. थोरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भाजप आमदार, कार्यकर्ते यांचे मनोधर्य खचू नये, म्हणून जे. पी. नड्डा हे वारंवार असे वक्तव्य करत असतात. जे की कवितेच्या धृव पदासारखे आहे. भाषणामध्ये जर ते असे बोलले नाही तर त्यांचे आमदार कुठे जातात की काय?, अशी भीती त्यांना आहे.
परंतु महाराष्ट्र महाविकास आघाडीचे हे सरकार भक्कमपणे पाच वर्षे चालेल, निश्चितपणे चांगले काम करेल. एकनाथ खडसेंबाबत बोलताना ते म्हणाले, नाथाभाऊ यांना अनेक वर्षापासून आपण ओळखतो. एक सक्षम असा विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. भाजप-सेना सरकार येण्यामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे होते. पण त्यांना दिलेली वागणूक ही पाहिल्यानंतर कुणालाही वाईट वाटेल, अशीच आहे.
रिपब्लीक टिव्हीने लोकशाही विघातक काम केले
टीआरपी वाढविण्यार्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. टीआरपी घोटाळा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुढे आणला होता. रिपब्लीक टीव्ही कशा पद्धतीने बातमी देत होते. कशा पद्धतीने संपूर्ण समाजात प्रक्षोभ निर्माण करण्याचे काम ते करत होते. एका चुकीच्या दिशेने नेण्याचे काम ते करत होते. हे सगळ्यांना मान्य आहे. आणि जे चुकीचे चालले होते ते चुकीचे काम बंद करण्याचे काम केलेच पाहिजे. आणि मुंबई पोलिसांनी हे केले असेल तर ते चांगलेच केले. वस्तुस्थिती बाहेर आली. आणि हे उघड झाल्यानंतर आता त्यांचावर कारवाई झाली पाहिजे, असे ना. थोरात म्हणाले.