भाजपातील अनेकांना राष्ट्रवादीचे वेध

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. उलट आगामी काळात राज्यासह जिल्ह्यातील भाजपाची नेतेमंडळी राष्ट्रवादीत येणार आहे.

त्यातील काही आताच संपर्कात असल्याचा दावा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. दरम्यान, पाथर्डीतील बिबट्याला नरभक्षक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करा व पुढील आवश्यक पाऊल तातडीने उचला, असे निर्देश अधिकार्‍यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर येथे पत्रकरांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, याबाबत एका प्रश्नावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.

याबाबत कुठलीही शंका नाही. पाच वर्षे आम्ही सत्तेतच राहणार आहोत, असे सांगत त्यांनी भाजपला चिमटा काढला. उलट नगर जिल्ह्यातील भाजपाची मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातील काही आताच संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. दहा लाख रुपये फिक्स डिपॉझिट करणार आहोत. या मदतीने मुलगा गेल्याचे दुःख कमी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून पथके आणली आहेत. 22 ते 25 ठिकाणी पिंजरे लावले आहेत.

बिबट्याला नरभक्षक ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांनी तशी तयारी देखील दाखवली आहे. मी सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला. एक तर बिबट्याला पकडा किंवा पुढील पाऊल उचला, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *