मुंबई l Mumbai
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्सा सांगितला. २००९ साली आर. आर. पाटील (RR Patil) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर (Blood pressure) आहे का? डायबिटीस (Diabetes) आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हंटले.
तसेच, मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. याशिवाय त्यावेळी माझ्या खाजगी सचिवाला त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं माझं मत तयार झालं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान जयंत पाटलांनी गृहमंत्रिपद नाकारल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. अजित पवार म्हणाले की, 'गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं' असं म्हणता अजितदादांनी चांगलीच फटकेबाजी केली.