
दिल्ली | Delhi
देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विरोधी पक्षांनीही तयारी केली असून, आता देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत I.N.D.I.A ची स्थापन केली. पहिली बैठक बिहारमध्ये तर दुसरी बैठक बंगळूरमध्ये झाली, आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत या आघाडीचे नेतृत्त्व देखील ठरवले जाणार आहे.
परंतु या बैठकीआधीच मोठी बातमी समोर येत आहे. बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी आज कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणुका देखील स्वबळावरच लढवणार असल्याचे मायवतींनी जाहीर केले आहे. मायावतींनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
“एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये बहुतेक पक्ष हे गरीबविरोधी, जातीय, सांप्रदायिक, श्रीमंतांच्या बाजूने काम करणारे आहेत. त्यांच्या याच धोरणांच्या विरोधात बसपा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यामुळे या आघाडीमध्ये सहभागी होऊन निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे माध्यमांनी खोट्या बातम्या पसरवू नयेत”, असं मायावतींनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकीकडे मायावतींनी इंडियामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला असताना त्या भाजपाला मदत करत असल्याची टीका केली जात होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं आहे. “विरोधकांच्या जुगाडापेक्षा समाजातल्या कोट्यवधी उपेक्षितांमध्ये बंधुभावाच्या आधारे जोडून त्यांच्या आघाडीसह २००७ प्रमाणेच आगामी लोकसभा व चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकट्याने लढेल”, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बसपाशी आघाडी करण्यासाठी सगळेच इच्छुक झाले आहेत. पण असं न केल्यास भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप होतो. त्यांच्याशी हातमिळवणी केली तर धर्मनिरपेक्ष आणि नाही केली तर मात्र भाजपासमर्थक. हे पूर्णपणे चुकीचं आहे”, असंही मायावतींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.