
मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज एकवटला असताना सरकारने EWS आरक्षणाची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असा सरकारच्या जाहिरातीमध्ये उल्लेख (Government Advertisment Over EWS Reservation) आहे. EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ मिळत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी १७ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसंच सरकारवरही ताशेरे ओढले. तुमच्या हातात दोन दिवस आहेत, मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “एक नवीन पिल्लु सकाळी आणलंय. तुम्ही वेडे समजता का आम्हाला? ईडब्ल्यूएस कोणी मागितलंय? कोणाला फायदा झाला आहे? सांगा एखादे नाव. मग कशाला आकडे मोडता? तुम्ही गणितशास्त्राचे मास्तर होता का?” असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांनी टीकास्र सोडले.
“सतत सांगायला लागलेत की ईडब्ल्यूएसचा फायदा झाला. बाकींच्यानाही सारथीसारख्या संस्था आहेत हे सांगितलं का? ईडब्लूएस दाखवालयला लागलेत, तसंच इतरांनाही आरक्षण आहे. त्याची आकडेमोड केली का? नाही केली. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय की जाहिराती छापायला पैसे आमचे, अर्धा कॉलम छापून आणणार ते आणि आम्हाला सांगणार काय फायदा झाला?” असेही जरांगे पाटील म्हणाले.
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी "तुमच्या हातात दोन दिवस आहेत. आरक्षणाचा निर्णय जाहीर करा. मराठ्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याशी खेळू नका, असे म्हणत आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही गाफील नाही, २५ तारखेनंतर पेलणार नाही अशा आंदोलनाची घोषणा करणार आहोत," असा इशाराही सरकारला दिला आहे.