मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) २५ आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांनी वाढदिवस आणि धुळवड आज साजरी केली. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे.
महाविकास आघाडीचेच २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. एकदा निवडणुका येऊ द्या, एक एक आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील. महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.
तसेच, आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना (Shivsena) बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला सुनावलं.
पुढे ते म्हणाले की, ज्या दिवशी शिवसेनेनं आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवं पांघरून घेतलंय आणि ते हिरव्याचं समर्थन करतात. फक्त उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावं. भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ होत असते.