<p><strong>मुंबई | Mumbai </strong></p><p>रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी दिली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. </p>.<p>सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचवण्यात आली आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे दिली आहेत. त्यामुळे यामध्ये खो घालण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी सुचवेली नावे ही भाजपची नवी चाल असल्याचे बोलले जात आहे.</p><p>तसेच त्यांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत करावी, अशा आशयाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री आम्ही आंदोलन केलं तर कोविडचं कारण दाखवून त्यावर नाराजी व्यक्त करतात. पंतप्रधानांकडे तक्रार करतात. पण आम्ही झपाटलेला या सिनेमातला बाहुला पाहिलाय. त्याच बाहुल्यासारखं मुख्यमंत्री सारखा सारखा करोनाचा बाहुला पुढे करतात, असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.</p>