
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावर तसेच वज्रमूठ सभेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसून, केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेसाठी समसमान जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा झाली आहे. विरोधक कायमच महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची टीका करतात. शिवाय तिन्ही पक्षांना समान वागणूक मिळत नसल्याचं बोललं जातं. या सगळ्या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा प्रस्ताव पुढे केला आहे.
१६-१६-१६ जागांच्या फॉर्मुल्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटप समान झाल्यास एकत्र असल्याचा संदेश जाईल अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे, अशी माहिती आहे. महाविकास आघाडी म्हणून २०२४ ची निवडणूक एकत्र लढायची असल्यास समसमान जागा वाटप व्हायला पाहिजे. यामुळे जनतेत एकता आणि समानतेचा संदेश जाईल. शिवाय तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती आहे.