<p><strong>मुंबई | Mumbai </strong></p><p>महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. दरम्यान काँग्रेसला नेहमीच दुर्लक्षित केले जात असल्याच्या चर्चा होत असतात. </p>.<p>एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. यावरूनच आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष दुखावला गेल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसनं मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.</p><p>महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. “आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.</p>.<p><strong>काय म्हणाले होते शरद पवार?</strong></p><p>राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. एका मुलाखतीदरम्यान 'सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?' या प्रश्नावर पवार म्हणाले होते की, 'याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.'</p>