मुंबई | Mumbai
शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांचं सध्या शिवसंवाद अभियान सुरू आहे. या अभियानात आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं आव्हानही देत आहे. आदित्य ठाकरेंच्या याच टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले.
'आदित्य ठाकरेंचं आव्हान पोकळ आहे. आपल्या भागातील लोकांवर अन्याय होतो तेव्हा तेथील जनता पेटून उठते. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा कोकणावर अन्याय झाला असं लोकांना वाटलं. त्यावेळी श्याम सावंत यांना सोडलं तर शिवेसनेचे सर्व उमेदवार पडले होते हा इतिहास आहे. धमक्या कोणाल देत आहेत. कोणीही घाबरत नाही,' असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
तसेच, 'शिवसेनेत आमदारांनी केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांचा अपमान करण्यात येत आहे. त्यांना गद्दार म्हटले जात आहे. कट्टर शिवसैनिकांमुळेच शिवसेना ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा अपमान करू नका. शिवसैनिक दूर गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी यात्रा सुरू केल्या आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही आदराने बोलतो. तुम्हीदेखील आदाराने बोला.' असंही दीपक केसरकर म्हणाले.