
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं.
या सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज (6 डिसेंबर) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद दिली.
या पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलला आहे. आमचा सीमाभागात जाण्याचा दौरा होता. याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. बेळगावमधील गावात जाऊन त्याच्याशी चर्चा करणार होतो.
कर्नाटक सरकारने सीमेवर मोठा बंदोबस्तही लावला. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कारवाईची भाषा करू लागले होते. हे चुकीचं असून भारतातील कुठलाही व्यक्ती इतर राज्यात जाऊ शकतो. आज महापरिनिर्वाण दिनी जाऊन कुठेही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.