
मुंबई | Mumbai
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत वाद पेटला होता, सत्यजित ताम्बेंच्या पत्रकार परिषदेने या वादाला दुजोरा दिला होता.
नंतरच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे राजीनामानाट्य समोर आले, त्यातून पटोले-थोरात वादाचा विषय चर्चिला जाऊ लागला, महाराष्ट्र काँग्रेस मधील या सर्व गोंधळावर पडदा पडावा यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न सुरु केले आहेत, त्याच्याच भाग म्हणून आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
या दोघं नेत्यांमध्ये विविध विषयांवर दीर्घ चर्चा झाली. या भेटीतील चर्चेनंतर थोरातांची काय भूमिका आहे याविषयी माध्यमांनी त्यांचे मत नाणून घेतले, तेव्हा बाळासाहेब थोराता यांनी (Balasaheb Thorat) आपले मत व्यक्त केले, ते म्हणाले “मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलो नाही. माझा राजीनामा (resignation) हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठे रूप दिले. आज माझी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी (Maharashtra Congress) एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.
थोरात पुढे म्हणाले, “प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच. के. पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत,” असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.