मुंबई | Mumbai
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठिणगी पडली आणि अधिवेशानाच्या कामकाजात घोषणाबाजी सुरु झाली.
विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत, असं राऊत म्हणाले.
हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांचा अचानक संताप झाला. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं पैस देण्याचं, ५० -५० लाख खात्यावर देण्याचं वक्तव्य कधीही केलेलं नाही, असं वक्तव्य कधी केलं असेल, तर दाखवा, पुरावा द्या, नाहीतर सभागृहाची माफी मागा. हा सभागृहाचा अपमान आहे.
दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.